Рет қаралды 20
पुण्यात रज महोत्सवाचे आयोजन
रज महोत्सव हा ४ दिवसांचा उत्सव ओडिशा मधील रथयात्रा उत्सवानंतरचा दुसरा सर्वात लोकप्रिय उत्सव आहे. वर्षा ऋतुच्या सुरवातीस पृथ्वी मातेच्या जननक्षमतेचा चा उत्सव म्हणून साजरा केला जाणाऱ्या महोत्सवात महिला आणि यौवनात पदार्पण करणाऱ्या मुली यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. या सांस्कृतिक परंपरेची माहिती पुढच्या पिढी पर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कलिंगा कला केंद्राच्या संस्थापिका डॉक्टर ममता मिश्रा यांनी रज महोत्सवाचे आयोजन केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ओडिशा आणि बंगाल मधे पूर्वापार चालत आलेल्या रुढी परंपरा आणि उत्सवाबद्धल सविस्तर माहिती दिली. या वेळी ट्रस्टचे निक्षिता सारंगी, लोकनाथ सारंगी, संगीता मिश्रा, प्रियांका बोस आणि सरोज साहू उपस्थित होते.
डॉ. मिश्रा म्हणाल्या, पहिल्या पावसाचे थेंब धरणीमातेवर जेव्हा बरसतात त्या वेळी धरणीमाता रजस्वला असते असे मानून या चार दिवसाच्या उत्सवात पृथ्वी मातेचा आदर म्हणून सर्व कृषी कार्ये थांबवली जातात. गोड धोड करून घरातील सर्व मंडळी आनंदोत्सव साजरा करतात. ओडिशा आणि बंगाल मध्ये हा चार दिवसांचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. पृथ्वी मातेच्या स्त्रीत्वाचा सन्मान तसेच ओडिशातील भगवान जगन्नाथ यांची दुसरी पत्नी भूदेवी (भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी) यांच्या सन्मानार्थ ‘रज महोत्सव’ साजरा केला जातो. या उत्सवात चार वेगळे दिवस असतात. रज, मिथुन संक्रांती, शेष रज आणि वसुमती स्नान, जेथे देवी भूदेवीच्या मूर्तीला फुलांनी हळदीच्या पाण्याने स्नान घातले जाते. भू माता आगामी पावसाळ्यासाठी स्वत:ला तयार करते असे मानतात. आपल्या कडे भारतात मासिक पाळी अशुद्ध संकल्पना मानली जात होती व या काळात पूजाअर्चा किंवा इतर धार्मिक विधीं पासून महिलांना दूर ठेवायची प्रथा असताना मात्र ओडिशा बंगाल मधे ही असामान्य परंपरा मोडून स्त्रीत्व साजरे केले जाते. चार दिवसाच्या उत्सवाने स्त्रिया आनंदी असतील तर देवी भूदेवी देखील प्रसन्न होईल आणि ती त्यांना चांगले उत्पन्न आणि संततीचे आशीर्वाद देईल ही या रजोत्सवामागची संकल्पना असल्याचे डॉ. मिश्रा यांनी सांगितले. डॉ. मिश्रा या कलिंगा कला केंद्र ट्रस्टच्या माध्यमातून स्त्रीत्वाचा सन्मान तसेच मासिक पाळी दरम्यान स्वच्छता, आरोग्य, आहार याविषयी मनोरंजनाच्या माध्यमातून जन जागृती करण्याच्या दृष्टीने गेली एक दशक कार्यरत आहेत.
यंदाच्या रज महोत्सवात घडणार ओडिशा बंगाल आणि महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे दर्शन !
पुण्यात दि २१ जून रोजी जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे दु. ४ वा. ओडिशा, बंगाल या राज्यांबरोबरच महाराष्ट्रातील काही भागात साजरा करण्यात येणाऱ्या ऋतुमती सोहोळ्या वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मधे तीन वेगळ्या राज्यातील कलाकारांचे वादन, गायन आणि नृत्य याचा समावेश करण्यात आला आहे. ओडिशाच्या सुप्रसिध्द लोकगीत गायिका अनिंदिता दास, ओडिसी नृत्यांगना मधुमिता मिश्रा यांच्या शिष्या, शास्त्रीय गायिका विलिना पात्रा, ओडिसी कलाकार प्रभाकर स्वेन, बंगालचे लॅप गिटार वादक श्यामल बॅनर्जी, शास्त्रीय गौडियो नृत्यांगना पौलोमी चॅटर्जी, कथ्थक नृत्यांगना सहाना रे, गायिका निवेदिता दत्ता ओडिशा आणि बंगाल ची कला सादर करणार असून ट्रस्ट च्या महाराष्ट्र सांस्कृतिक सचिव मंजुषा रवी भास्करवार आणि त्यांची टीम मासिक पाळीवर आधारित मराठी लघु नाटिका तसेच मयुरी अत्रे मराठी गाणी सादर करणार आहेत. नृत्यांगना वृंदा साठे आणि सहकारी महाराष्ट्रातील ‘ऋतुमती सोहळ्यावर’ आधारित नृत्य रचना सादर करणार आहेत. महोत्सवात ओडिशाच्या पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. महोत्सवात गुडगावमधील पॅड वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड आणि डायपरच्या निर्मात्या मोनालिशा कानुनगो, फिनोलेक्स चे विक्री विपणन अध्यक्ष प्रदीप वेदुला, संजीव पटजोशी, आयपीएस, महासंचालक आणि अध्यक्ष, उद्योजक बिरेन साहू, ट्रस्टच्या ओडिया सांस्कृतिक सचिव सरोज साहू आणि बंगाल सांस्कृतिक सचिव प्रियांका बोस उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती श्वेता राउत (आरजे स्वाती) करणार आहेत.